बुधवार, ४ मे, २०१६

झिंगाट आणि बॉयकॉट

           
  
  (स्रोत : साभार इंटरनेट)
          
      हे दोन शब्द सध्या महाराष्ट्रातून कानावर पडत आहेत, एका शब्दाचं गारुड आणि दुसऱ्यातून; जो त्याच्या अर्थातच दडलेला असा रागाचा सूर अनुभवायला मिळत आहे. या दोन्ही शब्दांचा संबंध एकाशीच आहे,  "सैराट".(Sairat).
              भन्नाट दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा हा चित्रपट सध्या सैराट होऊन धुमाकूळ घालतो आहे. 'An epic love story' अशी ओळ लिहून ज्याप्रमाण याचं जोरदार प्रमोशन  केलं गेलं, त्याचप्रमाणं महाराष्ट्र त्याला डोक्यावर घेताना दिसत आहे. कारण अजय-अतुल यांचं बहारदार संगीत, सिनेमाला असलेला स्पेशल 'नागराज' टच, सुंदर चित्रीकरण आणि करमाळ्यातली सुंदर लोकेशन्स  यामुळे खरंच 'याड लागलंय'. याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. या चित्रपटाची संकल्पना ज्यावर आधारित आहे ती नाजूक भावना साधं आयुष्य कसं सैराट बनवते याचा हा लेखा-जोखा. 'प्रेमात असते मृदुता; कठोरताही असते, फुलाप्रमाणे नाजूक प्रेम पाषाणाला ही भेदू शकते'  या कुण्या कवीच्या वाचलेल्या ओळींचा प्रत्यय हा सिनेमा बघताना येतो. या चित्रपटाला असलेला मराठी उसाचा गोडवा आणि त्याला येणारा कस्तुरीचा वास पार जर्मनीमध्ये ही दरवळला आणि बर्लिनकर ही त्यामुळे झिंगाट झाले; दणक्यात प्रीमियर पार पडला. प्रमोशनवेळी दिलेल्या मुलाखतीत नागराज म्हणतात तसं त्यातलं परश्या - आर्चीचं प्रेम प्रेक्षकांना आपलस वाटून जात आहे. आकाश ठोसर-रिंकू राजगुरू या दोघांचा पहिल्याच प्रयत्नातला अभिनय अतिशय सुंदर आहे, त्याबद्दल अभिनेता आणि अभिनेत्रींचं सगळीकडून कौतुक होत आहे. रिंकू-प्रेरणाने तर पहिल्याच चेंडूंमध्ये राष्ट्रीय पुरस्काराचा षटकारच मारला. संगीत - अजय अतुल (Ajay - Atul) म्हणलं की पुढं काही बोलायचीच गरज आहे असं वाटत नाही. "याड लागलं" आणि "सैराट झालं जी" यातली सिंफनी, "आता ग बयाचा" रॉक बाज आणि "झिंगाट"वर तर तरुण, म्हातारे-कोतारे, बाया बापड्या सगळीच हौस फिटे पर्यंत नाचत आहेत. या द्वयींच्या संगीताची गोडी शब्दांत मांडणं अवघड आहे, कारण त्याचा केवळ अनुभव घ्यावा आणि तृप्तता मिळवावी. हा सिनेमा प्रेम रसात ओतप्रोत न्हाऊन गेलेला आहेच पण शृंगार, करुण ,वीर, रौद्र, हास्य आणि शेवटी पसरणारी भयाण शांतता इ.रसांचा नागराज यांनी  सुरेख मेळ घातलेला आहे. एकूणच पब्लिकच्या तोंडून ऐकायला मिळत आहे, "झालय झिंग झिंग झिंगाट....."
                आता या झिंगाट मध्ये बॉयकॉटचा विषय कुठून आला? वर तोंड भरून कौतुक केल्यानंतर बहिष्कार करण्यासारखं आहेच काय यांत? आले ना हे प्रश्न डोक्यात? बघितल्यानंतर मलाही हे उमगत नव्हतं की बॉयकॉट कशासाठी? नंतर समजलं की सैराटच्या पटकथेत उच्च जातीत जन्मलेेली तरुणी व नीच जातीत जन्मलेल्या तरुणाची प्रेमकथा आहे, प्रेमासाठी घर-दार सोडणं याला समर्थन करायचं? का? हा संस्कृतीवर घाला आहे. तसंच यामुळं तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या  मुला-मुलींवर वाईट संस्कार होतील, सिनेमा बघून ते असंच काही भलतं-सलतं करतील. "V" किंवा "Mtv" वरचे थिल्लर कार्यक्रम तरुण पिढी आवडीने पाहते त्याच्याकडे काणाडोळा का? तेंव्हा संस्कार आडवे येत नाहीत? गद्धे पंचविशी येईपर्यंत २-३ वेळा ब्रेकअप , पॅचअप होऊन जातं आणि प्रेमिकांनी "चिल्ल" मारलेलं असतं याचा थांगपत्ता असतो कुणाला? चित्रपटात प्रेमाचा ओलावा जसा दाखवला तसे नंतर वास्तवाचे चटके सुद्धा कसे बसतात यावर ही प्रकाश टाकण्यात आला आहेच की,  मग प्रेम करावं की नको हा ज्याचा त्याचा प्रश्न!
     जातीयवाद पसरवतात म्हणून एकीकडे राजकारण्यांना शिव्या द्यायच्या आणि आपण त्याच पंक्तीला जाऊन बसायचं, हा विरोधाभास कसा कायजमतो आपल्याच लोकांना? हो आपल्याच लोकांना! कारण सारे भारतीय 'माझे' बांधव आहेत. तर या आपल्याच लोकांनी तुमचे सावरकर आणि आमचे बाबासाहेब हे केलंच आहे पण आता कलाकृतींच्या बाबतीत ही? का?  आमची 'कट्यार' तुमचा 'सैराट' हा 'ट्रेंड' येऊ द्यायचा नाही. नागराज यांनी भीषण वास्तव, खोटी प्रतिष्ठा , विखारी मानसिकता मांडली तर बिघडलं कुठं? जे चित्रपटाच्या शेवटाचं समर्थन करणाऱ्या तथाकथित उच्चंवर्णीय अशा दोन्ही जातींमधले लोक म्हणतात की दलित - उच्चवर्णीय यांनी लग्न केल्याचा परिणाम असाच होणार! मग कोल्हापुरातील विवाहित ब्राह्मण तरुण - मराठा तरुणी ते ही असेच दुर्दैवी ठरले. त्याबाबत काहीच अवाक्षर नाही. या मानसिकतेच्या त्रासातून बाजीराव-मस्तानी किंवा पठ्ठे बापूराव-पावळा सुटले नाहीत तर आर्चि- परश्याची काय बात महाराजा! म्हणूनच सोशल मीडियावर #boycottsairat पाहायला मिळत आहे.
यासाठी नागराजला एकट्यालाच का जबाबदार धरायचं? निर्माते निखिल साने आणि नितीन केणीही आहेतच की!
    आपल्या देशात चांगल्या परंपरा आहेत त्यामुळंच आपली संस्कृती टिकली आहे, पण त्यासोबत विषारी मानसिकता बाळगणे, खोट्या प्रतिष्ठेपायी प्रेमिकांचा बळी घेणे, जातीयवाद याचीही  जपणूक होत आहे ,हे वाईट आहे.
एकीकडे संवेदनशीलता, प्रेम, नवं काही करण्याची उर्मी आणि दुसरीकडे खोटी प्रतिष्ठा, जातीयवाद आणि विषारी मानसिकता. बॉयकॉट कशाचा करायचा? हे सुज्ञांस सांगणे  न लगे!


गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

निंदकाचे घर

     

    "निंदकाचे घर असावे शेजारी" या संतशिरोमणी श्री. तुकाराम महाराजांच्या ओळी स्वानुभवातून आल्या आहेत. निंदकाने केलेल्या निंदेमुळे आपण ध्येयप्राप्ती साठी योग्य मार्गक्रमण करत आहोत का? हे तपासून पाहण्याची ती संधी मिळालेली असते. अपयश लाभल्यामुळे खूप वेळा निंदा सहन करावी लागते, या संक्रमणाच्या काळात निंदकाला हितचिंतक न मानता आपण त्याच्याबद्दल मनात अढी धरून बसतो. स्वाभिमानाला पोहोचलेल्या धक्कयामुळे त्या टीकेला होकारार्थी वळण देण्यासाठीच्या मानसिकतेची अतीव कमतरता बहुतांशी लोकांमध्ये दिसून येते.
              व्यक्ती जितकी महान असते तितकी अधिक निंदा तिच्या वाट्याला येते. हे निंदारूपी टाकीचे घाव व्यक्तीला देवत्वाकडे घेऊन जातात, पण तो मान-मरातब मिळाल्यावर प्रशंसकांबरोबर निंदक ही हातात हात घालून त्यांच्यासोबत आलेले असतात. मुद्दाम टीकाकार हा त्याच्याजवळ असणारा शब्द वापरण्याचं टाळलं कारण टीकाकार हा उत्प्रेरक/कॅटॅलीस्ट आहे जो चुका-दोष हा अनावश्यक भाग बाजूला काढून बाकी त्याच्या व्याखेनुसार काम करतो. तो ज्याच्यावर टीका करायची आहे त्याच्या यशापशाचा लेखा-जोखा त्यानं समोर ठेवलेला असतो, त्यावरच तारतम्य बाळगून तो भाष्य करत असतो. आजकाल जो उठतो तो टीकाकाराची भूमिका बजावतो आहे, पण हे टीकाकाराचं कातडं पांघरलेले निंदक आहेत, त्यांची भडक निंदाच याची जाणीव करून देत आहे.
सामाजिक प्रसारमाध्यमांमुळे याला मोकळं रान मिळालं आहे. नरेंद्र मोदी असोत की राहुल गांधी असोत, केजरीवाल असोत की कन्हैया कुमार; यांच्या समर्थकांनी त्यांची निंदा केली त्यांचे समर्थक यांची निंदा करायला कंबर कसून तयार. याला सध्याच्या बोलीभाषेत ट्रोलिंग म्हटलं जातं आणि हे करत बसतात ते ट्रोलर्स. चुका झाल्या तर तीव्र शब्दांत खरडपट्टी नक्कीच काढावी, अपराध घडला असेल तर कडक शासन करण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था आहेच पण स्तर सोडून निंदा करण्याचा कसोशीने प्रयत्न का? ही घाणेरडी मानसिकता संसर्गजन्य रोगासारखी फैलावताना दिसत आहे. याला अटकाव घालण्याची तसदीही कुणी घेत नाही.
            वैचारिक मतभेद असतीलही, का असू नयेत? पण वैचारिक मतभेद असणाऱ्यांनी परस्परांना शत्रू मानून संधी मिळेल तेंव्हा पोटभर निंदा करून एकमेकांवर तोंडसुख घेण्याचा आटोकाट प्रयत्न चाललेला असतो. साधक-बाधक चर्चा करण्याची वृत्ती, समोरच्याची बाजू ऐकून घेण्याचा धीर या गोष्टींचा या मंडळींच्याकडे अभावच आहे अशी दूषित मानसिकता घेऊन कसं जगता येतं हे त्याच निंदकांना माहीत! आणि हे सगळं समोरासमोर करण्यासाठी अजिबात वेळ नाही, पण दिसला बॉक्स की द्या कॉमेंट, टाका पोस्ट...प्रातःकाळी हरिनामाऐवजी आज कुणाला आणि कसं ट्रोल करावं हाच विचार करत असतील बहुतेक. ऑफिस मधला रिकामा वेळ असो, जेवणाची सुट्टी असो सामाजिक प्रसारमध्यमांवर काही लोक तीन प्रहरी हेच काम करताना आढळतात, यांना केवळ ब्रेकिंग न्युज मिळण्याचा अवकाश असतो. जेष्ठ नागरिकांसोबत तरुणही त्याच मार्गाला लागले आहेत. या उद्देशासाठी अशा समविचारी जनांचे समूह होताना पहायला मिळत आहेत. यासाठी या लोकांना स्वतःच्या वैचारिक, बौद्धिक पात्रतेचा विसर पडल्याचं जाणवत आहे.
             हे सत्कार्य करण्यासाठी फावला वेळ खर्ची घालवण्यापेक्षा आपले छंद जोपासणे, आपल्याजवळचे ज्ञान या समूहांतून नव्या पिढीला देणे, विचारांचे आदान-प्रदान करणे, सामाजिक प्रश्नांवर काम करण्यासाठी एकत्र येणे इ. स्वप्नवत गोष्टी सामजिक प्रसारमाध्यमांवरील समूहांमधून कधी साध्य होतील? विज्ञानाच्या प्रगतीमुळे मिळालेल्या या सामाजिक माध्यमांसारख्या अमूल्य देणग्यांचा वापर स्वहितार्थ तथा जनहितार्थ करणार का? तर कधी करणार? हा प्रश्न स्वतःला विचारण्याची हीच वेळ आहे. ती दवडु नये असं वाटतं.

मातृ दिनाच्या इतिहासाची कहाणी

                              प्रेम स्वरूप आई वात्सल्यसिंधु आई                  बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी                             ...