रविवार, २३ डिसेंबर, २०१८

तुंबाड- जिद्द आणि षडविकारांची कहाणी....

               
                            (स्रोत : साभार इंटरनेट)

       १९१३ साली सुरू झालेल्या भारतीय सिनेसृष्टीची पाहिली काही वर्षे पौराणिक चित्रपट व१९३१च्या "आलम आरा" या बोलपटा नंतर ऐतिहासिक विषयांवर आधारित सिनेमे बनवले गेले. नवरसांपैकी काही प्रकारांवर आधारीतच सिनेमे तयार झाले. अजून  काही प्रकार ज्यांना सध्याच्या भाषेत genre असं म्हणतात  अद्भूत, रौद्र, भयानक इ. बाकी होते. भयपटांचा जन्म होण्यासाठी १९४९ साल उजाडले, 'महल' हा कमाल अमरोही दिग्दर्शित पहिला भयपट म्हणता येईल त्यानंतर बीस साल बाद, गुमनाम , दो गज जमीन के नीचे पासून ते रात, भूत, राज अशी भली मोठी यादी देता येईल. आता यामध्ये भर पडली ती एका नव्या सिनेमाची.....
तुंबाड.....(Tumbbad)
             बॉलीवूड भयपटांचा चेहरा मोहरा बदलणारा म्हणून त्याचं सर्वत्र कौतुक  होत आहे. व्हेनिस फिल्म फेस्टिवल मध्ये ही याचा बोलबाला झाला. खरतर गूगल किंवा विकिपीडिया यांप्रमाणे त्रिकालज्ञानी नसल्यामुळे तुंबाड बद्दल , त्याच्या दिग्दर्शक किंवा कलाकारांबद्दल काहीच माहिती नव्हती. 'संगीत:अजय-अतुल' (Ajay - Atul) या एका गोष्टीमुळे सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. सिनेमा आणि संगीत या दोन्ही गोष्टींचा नाद असलेल्या माझ्या सारख्या माणसाला नवीन दृक्श्राव्य मेजवानी हवीच असते.
              'प्रयत्ने वाळूचे कण....' या ओळीला सार्थ ठरवणं किंवा प्रत्यक्षात उतरवणं म्हणजेच 'तुंबाड' आहे. तसं एका ओळीत त्याचं वर्णन करणं हे खूपच धाडसाचं काम आहे कारण तो केवळ एका कथेचं छायाचित्रण नाहीए; ती एक तपश्चर्या आहे, कारण तुंबाडची जन्मकथा ऐकताना हे लक्षात येतं. लेखक-दिग्दर्शक राही अनिल बर्वे (Rahi Anil Barve) यांचा हा पहिलावहिला चित्रपट. १९९७ मध्ये नागझिराच्या जंगलामध्ये एका रात्री मित्राकडून ही कथा ऐकताना अनुभवलेली भीती नंतर त्यांनी ७०० पानांत शब्दबद्ध केली.... १९९७- २०१२ 'तुंबाड' हा काळाच्या गर्भात होता. आणि शूटींग सुरू होण्यासाठी २०१२ साल उजाडले. हा काळ बर्वेंसाठी खूपच कठीण होता. संयम, चिकाटी-जिद्द, मेहनत आणि त्यावरचा विश्वास या त्यांच्या अंगी असणाऱ्या सगळ्या गोष्टींची कसोटी घेणारा तो काळ... या काळात बर्वेंच्या आईचे आजारपण व निधन नंतर अनुराग कश्यप यांनी दिलेला मदतीचा हात ही तुंबाडच्या निर्मितीच्या पडद्यामागच्या गोष्टी आहेत. काळाच्या भट्टीमध्ये तावून सुलाखून निघालेल्या तुंबाडच सोनं झालं कारण आनंद एल्. राय आणि सोहम शहा (Soham Shah) (शीप ऑफ थिसिस फेम) असे मातब्बर निर्माते त्याला मिळाले.
                    तुंबाड हा सिनेरसिकासाठी full of surprises आहे. सासवडच्या ज्या वाड्यात बहुतांश भाग चित्रित अर्थात शूट झाला आहे त्यात सेट्स कोणते आणि खरा वाडा कोणता यातला भेद करता येत नाही. Scene साठी लागणारा योग्य प्रकाश , वातावरण मिळण्यासाठी निर्माता- अभिनेता सोहम शहा पासून टीमचा प्रत्येक माणूस यांचं तासन्तास वाट पाहत राहणं हे थक्क करणारं आहे. अजून भरीस भर म्हणजे पाऊस हा या कथेचा अविभाज्य भाग असल्यामुळे पावसाचे सर्व scenes हे खऱ्या पावसातच शूट केले गेले. 'पांडुरंग' नावाचं पात्र रंगवणारा बालकलाकार मोहम्मद सामाद (Mohammad Samad) याने तर चित्रपटाच्या पहिल्या भागात असणाऱ्या विनायकच्या आजीही साकारली आहे जी राक्षसी आहे त्यासाठी त्याला 10 किलो वजनाचे Prosthetics परिधान करावे लागले आहेत. एकमेव गीत जे की शीर्षकगीत आहे त्याला अजय-अतुल यांनी नेहमीप्रमाणे छान संगीतबद्ध केले आहे पण हे गाणे अतुल गोगावले यांनी गाणे हे ही आश्चर्यकारक आहे.  बाकी कॅमेरामन पंकज कुमार यांचं छायाचित्रण उत्कृष्ट, बाफ्टा पुरस्कार विजेता आणि हिटमन सीरीज आणि अस्सासीन्स क्रीड या प्रसिद्ध विडिओ गेम्सना संगीत देणाऱ्या जॅसपर कॅड चे जबरदस्त पार्श्वसंगीत,सर्व कलाकारांचा अभिनय ही उत्तम. आदेश प्रसाद, राही बर्वे, आनंद गांधी आणि मितेश शहा यांनी पटकथा लिहिण्याचं काम सुंदर केलं आहे.
         सिनेमाची कथा मराठी साहित्य क्षेत्रातले प्रसिद्ध भयकथाकार नारायण धारप यांच्या भयकथेवर आधारित आहे पण सिनेमा हा सम्पूर्णपणे भयपट म्हणण्यापेक्षा भय , रहस्य , साहस इत्यादी प्रकारांमध्ये मोडतो. त्याला भयपट का म्हणावं याबद्दल  youtube वर असलेल्या एका मुलाखती मध्ये राही बर्वे सांगतात , "तुंबाड में भूत नही इंसान डराते हैं " (खरंतर हे ऐकल्यामुळे माझी सिनेमा पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढली.) ते अस का म्हणाले? याचं उत्तर पाहताना प्रत्येक वेळी मिळतं.
"सगळ्यांची गरज भागवण्याचं काम निसर्ग करतो पण प्रत्येकाची हाव पुरी करण्याचं नाही- महात्मा गांधी" या वाक्यापासून सिनेमा सुरू होतो. तीन कालखंडात याची कथा घडताना दाखवण्यात आली आहे.
१९१८ सालचा पहिला भाग, १९३३ चा दुसरा व १९४७ चा स्वतंत्र भारतातला तिसरा.
पुराणकालीन एक कथा ज्यात समृद्धीची देवी, पृथ्वी तिचा गर्भ आहे व ती अमर्याद धन (सोनं) - धान्याचं प्रतीक आहे. ती १६ कोटी देवतांना जन्म देते पण थोरला मुलगा हस्तर तिचा जास्त लाडका असतो जो अत्यंत लालची असतो देवीच्या सर्व सोन्यावर तो कब्जा करतो आणि धान्याकडे नजर वळवतो तेंव्हा बाकी देवता त्याचा पराभव करून त्याला शाप देतात, म्हणून त्याचा उल्लेख ना वेद-पुराणात आहे ना त्याचे कुठे मंदिर आहे. पण तुंबाड गावात राहणारे एक कुटुंबीय हस्तरची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतात आणि आपल्या वाड्यात त्याचं मंदिर बांधतात. पिढ्यान्पिढ्या हस्तरची भक्ती चालूच आहे आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या सोन्याचा ओघ ही अखंड आहे. दुर्जनांच्या संगतीला जाणारे दुर्जनच होतात. हस्तर हावरट आहेच आणि त्याची भक्तावळही तितकीच हावरट आहे. हस्तरला हाव आहे ती केवळ अन्नधान्याची पण भक्तावळीची हाव मोठीच हस्तरपेक्षाही जास्त कारण अन्नाबरोबर सोने-खजिना यांचा मोह त्यांना न आवरता येण्यासारखा आहे. सोबतीला कामवासना , मत्सर, क्रोध याचीही देणगी आहेच. या कुटुंबातल्या मागच्या पिढ्यांनी पुढल्या पिढ्यांना हे दुर्गुण वारसा स्वरूपात दिले असावेत असं वाटतं. षडविकारांच्या आहारी गेलेली ही कथानकातील पात्रे त्या षडविकारांच्या हातातल्या कटपुतल्या वाटतात. म्हणून बर्वे यांनी म्हटलेलं "इंसान डराते हैं" हे वाक्य पटतं. या षडविकारांचे भोक्ते असणाऱ्या पात्रांच्या नशिबी दुर्दैवी मृत्यू तरी किंवा वर्षानुवर्षे मृत्यूची वाट बघत जगणं तरी येतं असं सिनेमात दाखवलं गेलं आहे.
म्हणून आपल्या संतांनी 'सज्जनांची संगत धरा आणि षडरिपूंचे दमन करा' अशाच प्रकारचा संदेश दिला आहे.
         तर अशीही जिद्द-चिकाटी आणि मेहनतीचा महिमा सांगणारी आणि षड्विकारांचे दर्शन घडवणारी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण !.!.!

मातृ दिनाच्या इतिहासाची कहाणी

                              प्रेम स्वरूप आई वात्सल्यसिंधु आई                  बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी                             ...