शनिवार, ९ सप्टेंबर, २०१७

ब्रह्मं जानाति........

                    


                    ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः
        ही संस्कृत भाषेत सांगितलेली ब्राह्मण (ह ला म जोडलं जातं बरं का! कारण "गर्व से कहो" म्हणणाऱ्यां बहुतांशी महानुभावांनी या शुद्धलेखनाची माहिती घेतलीच नसावी) या शब्दाची व्याख्या. ज्याला ब्रह्म , अंतिम सत्य  समजलं आहे असा तो! तर "असा तो" किती ज्ञानी असेल याची कल्पना जर तुम्हाला ब्रह्म या शब्दाची व्याप्ती माहीत असेल तर नक्कीच येईल. तर ज्याला अंतिम सत्य काय आहे हे जर माहीतच आहे तर तो "असा" कसा ? हा प्रश्न मी नाही तर या शब्दाला स्वतःशी जोडणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा इतिहास विचारतो आहे कारण त्यांचा इतिहासच तेवढा महान आहे. तर या महान इतिहासाचा धांडोळा घेत गेलो तर बहुतांशी भाग हा असमानता, अस्पृश्यता आणि अत्याचार अशाच गोष्टींनी भरला आहे हे सत्य नाकारून चालणार नाही कारण याचा गाभा आहे तो म्हणजे स्वतःला अकारण श्रेष्ठ समजण्याची वृत्ती - सुपिरिअरिटी कॉम्प्लेक्स!
        इतकी प्रस्तावना देण्याचा उद्योग यासाठी की पुण्याच्या कुणी डॉ. खोले बाईंनी अब्राह्मण कामवाली २ वर्षे घरी कामाला ठेवली आणि तिच्या शिवाशिवीमुळे त्यांचा "सोवळ्यातला देव" बाटला गेला म्हणे! बापरे अंतिम सत्य जाणणाऱ्यांचे असले फुटकळ विचार?
आता संतश्रेष्ठ श्री नामदेव शिंपी (मुद्दाम उल्लेख केलाय) यांचा नैवेद्य स्वीकारणारा, किंवा संत जनाबाई , कान्होपात्रा यांच्या मदतीला धावून जाणारा देव यामुळे कसा काय बाटू शकतो? हा फार मोठाच प्रश्न आहे.
आता त्या बाईंचा हा वैयक्तिक प्रश्न असेल पण याची तक्रार पोलिसात देऊन त्यांनीच तो सार्वजनिक केलाय मग चर्चा तर होणारच! या बाई हवामान खात्यात उच्च पदावर कार्यरत होत्या म्हणून त्यांच्या मानसिकतेवर टीका करताना त्यांच्या व्यावसायिक आयुष्यावर भाष्य करण्याची काहीच गरज नाही पण सोशल मीडियावरच्या  लोकांना हे भान नाही. असो तर या बाईंची किंवा त्या संबंधित असलेल्या समूहाची मानसिकता व तिचे पैलू पाहिले तर आमची वाणी, आमचे संस्कार, आमचे वळण , आमचे कर्तृत्व , आमची बुद्धी आणि या बरोबर बाय डिफॉल्ट येणारे आमचे श्रेष्ठत्व; आमच्याकडील शुद्धता आणि उच्च दर्जामुळे इतरांनी ते मान्यच करायला हवे. बरं ते मान्यही करू पण "विद्या विनयेन शोभते" हे वाक्य अंमलात आणलं जाताना दिसत नाही ना! एखाद्या दिव्यांग व्यक्तीसमोर धडधाकट व्यक्तीने स्वतःच्या धडधाकटपणाचे भांडवल करणे व त्याला दुजाभाव दाखवणे नंतर त्याची परिणती अत्याचारात होणे यांत कसले आले श्रेष्ठत्वाचे शहाणपण? आता एक  नवीन टूम काढली आहे या श्रेष्ठ लोकांनी , "आम्ही कसल्याच "कुबड्या" घेत नाही, आम्ही आमच्या हिंमतीवर पुढे जातो." हिंमतीवर पुढे जाणे आणि जाता जाता इतरांना ठेचणे हाच इतिहास वर अधोरेखित केला आहे आणि या सद्गुणांमुळेच बाकीच्यांना राजकीय व शैक्षणिक "कुबड्या" देण्यात आल्या आहेत म्हणून त्याची संपूर्ण माहिती न घेता त्याबद्दल काहीही बोलण्याचा नैतिक अधिकार श्रेष्ठ लोकांना नाहीच मुळी!  पूर्वजांच्या या उज्ज्वल इतिहासाचा त्रास पुढच्या पिढ्यांना भोगावा लागतो आहे हे त्यांना मान्य नाही. श्रेष्ठत्वाचा टेम्भा मिरवताना स्वतःचे जातभाई असलेल्या ज्या थोर व्यक्तींचे गोडवे हे गातात तेंव्हा हा विचार त्यांनी सोयीस्कररित्या बाजूला ठेवलेला असतो की ते थोर लोक आपल्या "आदर्शवादी विचारसरणीच्या" पूर्णपणे विरोधी वागलेत उदा. ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ , श्रीमंत बाजीराव, आगरकर , न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे , सावरकर , महात्मा फुलेंना शाळेसाठी जागा देणारे भिडे इ. भले जग जरी चंद्रावर चाललं आहे तरी यांचा डोंगरावर राहण्याचाच अट्टाहास का? हे कळायला वाव नाही.
         ही मानसिकता आत्यंतिक कळकळीने फक्त जानवेधारकांनीच नाही तर वर्णव्यवस्थेतल्या बाकीच्या २ वर्णांनीही तितक्याच कसोशीने जपली. काश्मीर ते कन्याकुमारी हीच परिस्थिती होती. आता बहुजनवादाच्या नावाखाली "त्यांच्या महिलांना घरातून बाहेर काढून घरे पेटवून द्या" किंवा " १९४८ ला जे झाले परत होऊ शकते" अशा विचारांचे छापील साहित्य निर्माण करून  द्वेष पसरवणे हे प्रकार दिसून येतात.  आपल्याकडील थोर समाजसुधारकांनी या मानसिकतेवर कोरडे ओढले आणि त्या मानसिकतेचा वेळोवेळी द्वेष केला कुणा व्यक्ती किंवा व्यक्तीसमूहाचा नाही हे समजण्याची कुवत कागदोपत्री ब्राह्मण आणि अब्राह्मण लोकांकडे नसावी ही दुःखाची बाब आहे.
              पोथीनिष्ठता हीच या विखारी मानसिकतेचा आधार आहे. कोणा एका व्यक्तीने कुठल्यातरी पुस्तकामध्ये जे काही त्याचे विचार मांडले त्याच अनुसरण किती काळ करावं? बरं ते काळाला अनुरूप आहे का? हा साधा विचार का केला जाऊ नये? इतके आपण संवेदनाहीन झालो आहोत का? सोवळं-ओवळं, शिवाशिव व संबंधित फालतू परंपरा देव किंवा पितारांनी न सांगता धर्माच्या दलालांनी सांगितल्या आहेत हे ही कळू नये? आणि त्या सर्व प्रथा परंपरा यांची वैधता सदैव का ठेवायची? जे कालबाह्य आहे त्याची चिकित्सा करून ते सोडून जे चांगलं आहे त्याचंच पालन केलं जावं ना! यातच समाजाचं भलं आहे. बरं हे सगळं समाजसुधारकांनी कंठशोष करून फार पूर्वीच सांगितलं आहे.
         तरीही सडक्या प्रथा-परंपरांना धरूनच ज्यांना देव-धर्म करायचा आहे अशा सर्व जातीधर्माच्या लोकांनी गुरू ठाकूर यांनी 'भारतीय' या मराठी सिनेमासाठी लिहिलेल्या खालील गीताचे बोल विचारात घ्यावेत आणि आमच्यासारख्या रिकामटेकड्यांना हे असं लिहिण्याची संधी देऊ नये ही नम्र विनंती!

        तुझ्या-माझ्यात भेटल साऱ्यात तो।
        शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो।
        भाव भोळा जिथे धावला तो तिथे
        भाव नाही तिथे सांग धावल का?
    बघ उघडूनी दार अंतरंगातला देव घावल का?

वाचण्याचे अतोनात कष्ट घेतल्याबद्दल धन्यवाद!.!.!
        

गुरुवार, २० एप्रिल, २०१७

ईश्वराचा ध्यास पण मूलभूत अधिकाराचा ऱ्हास

           
    (स्रोत : साभार इंटरनेट)
              
   ईश्वराला कोणी डोळ्यांनी पाहिलेलं नाही त्याला अनुभवलं गेलं आहे कारण तो मूर्त आहे की अमूर्त याबद्दल मतमतांतरे आहेत. त्याच्या बद्दल असं सांगता येईल की ती सर्वोच्च पारलौकिक शक्ती असून त्याला जगताचा निर्माता - नियंत्रक असं मानलं गेलं आहे. त्याला भगवान, परमपिता, अल्लाह या विविध नावांनी ओळखलं जातं. मुळामध्ये 'ईश्वर' (GOD) हा संस्कृत भाषेतील शब्द आहे तो ईश - नियंत्रित करणे या धातूला वरच् प्रत्यय लावून तयार झाला आहे.प्रत्येक धर्माची ईश्वराविषयीची आपली एक परिभाषा आहे.  तर अशा या ईश्वराची उपासना जगामध्ये लोक आपापल्या ज्ञानाप्रमाणे आणि पद्धतीप्रमाणे करत असतात.
        आपल्या देशामध्ये विविध धर्माचे लोक त्यांचे सण, उत्सव अगदी आनंदाने साजरे करताना दिसतात,  याला विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड देऊन म्हणजे विजेच्या दिव्यांची रोषणाई, मोठमोठे कर्णे/स्पीकर्स यांच्या साथीने उपासना, उत्सवात भाविक रंगून जातात. देवाची आळवणी सामूहिकरीत्या करताना जो काही नाद तयार होतो त्यातून चैतन्यमय वातावरण होण्यापेक्षा भोवतालच्या लोकांना त्याचा त्रासच अधिक होतो आणि लोकांचे त्रासिक चेहरे पाहून कदाचित त्या देवालाही त्रास होत असावा.
               आपल्या देशाचा कोणताही अधिकृत धर्म नाही, कारण वर म्हटल्याप्रमाणे विविध धर्मिय इथे राहत असल्यामुळे घटनाकारांनीही भारत निधर्मी ठेवण्याची आणि तरीही धर्मस्वातंत्र्य देण्याची चतुराई दाखवली, पण घटनेनं भारतीय नागरिकांना धर्म स्वातंत्र्य दिलंय तरी किती? याची सुरुवात धर्म (Religion) म्हणजे काय? याचं उत्तर घटनेत काय नमूद केलं याची माहिती घेण्यापासून होते. धर्म या शब्दाची व्याख्या जन्माआधी व मृत्यूनंतर अशी परलोकातील बाब अशी करण्यात आली आहे. धर्मग्रंथ हा धर्माचा पाया आहे, त्यातल्या सांगितलेल्या आज्ञांचे पालन करून जर धर्म स्वातंत्र्य उपभोगायचे ठरवले तर राज्यघटना रद्द करावी लागेल कारण मूलभूत हक्क नावाच्या गोष्टीचा फारसा विचार या धर्मग्रंथांनी केल्याचं कुठं वाचनात नाही. घटनेत कलम २५ ते २८ ही मूलभूत हक्कासाठीची कलमे आहेत. कलम २५.१ अनुसार धर्म स्वातंत्र्य ४ बाबींच्या आधीन राहून उपभोगता येऊ शकते.
१. कायदा व सुव्यवस्था :
धर्माशी संबंधीत बाबीमुळे कायदा मोडता कामा नये व दैनंदिन व्यवहार विस्कळीत होऊ नयेत.

२. आरोग्य-वैयक्तिक व सार्वजनिक :
 धर्माने सांगितलेल्या रूढी-परंपरा पाळताना स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याला हानी होता कामा नये.

३. नीतिमूल्ये-स्वातंत्र्य, समता, बंधुता :
वरील नीतिमूल्ये विचारात घेऊन भेदा-भेद , स्पृश्यास्पृश्यता इ. वाईट चालीरीती सोडून धर्मपालन करणे.

४. दुसऱ्याच्या मूलभूत हक्कांची जपणूक:
धर्मातील प्रथा-परंपरा, सण-समारंभ यासाठी दुसऱ्याच्या मूलभूत हककांची पायमल्ली होता कामा नये.
या बाबींचा विचार करून धर्मपालन करणे याचं प्रमाण खूप कमी आहे. सर्वच धर्मियांची या बाबतीत सारखीच वागणूक आहे आणि कुणी वरील बाबींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आधार घेऊन वक्तव्य केलं की लगेच धार्मिक भावना दुखावल्या जातात. धार्मिक उन्मादातून कधी कधी भयानक पडसाद उमटतात म्हणून कुठल्याच धर्माचं उदाहरण इथे न घेतलेलंच बरं.
              हे टाळण्यासाठी वरील सगळ्याच बाबींचे ज्ञान समाजाला देणे ,त्यांचे गैरसमज दूर करणे उदा. Secularism म्हणजे सर्वधर्मसमभाव. Secularism हा धार्मिक बाबींतून झालेला अन्याय निवारण करण्यासाठी आहे. धर्माच्या व्याख्येनुसार परलोक आणि इहलोक अशी भान ठेवून विभागणी करून वागणे गरजेचे आहे.
       हे सगळं मांडता आलं याचं श्रेय राज्यघटनेला आहे कारण स्वतंत्र भारतात राज्यघटनाच (Constitution) सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळेच आम्ही शांततेत नांदू शकतो.
           राज्यघटनेचा विजय असो!                जय हिंद!


मातृ दिनाच्या इतिहासाची कहाणी

                              प्रेम स्वरूप आई वात्सल्यसिंधु आई                  बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी                             ...