गुरुवार, २० एप्रिल, २०१७

ईश्वराचा ध्यास पण मूलभूत अधिकाराचा ऱ्हास

           
    (स्रोत : साभार इंटरनेट)
              
   ईश्वराला कोणी डोळ्यांनी पाहिलेलं नाही त्याला अनुभवलं गेलं आहे कारण तो मूर्त आहे की अमूर्त याबद्दल मतमतांतरे आहेत. त्याच्या बद्दल असं सांगता येईल की ती सर्वोच्च पारलौकिक शक्ती असून त्याला जगताचा निर्माता - नियंत्रक असं मानलं गेलं आहे. त्याला भगवान, परमपिता, अल्लाह या विविध नावांनी ओळखलं जातं. मुळामध्ये 'ईश्वर' (GOD) हा संस्कृत भाषेतील शब्द आहे तो ईश - नियंत्रित करणे या धातूला वरच् प्रत्यय लावून तयार झाला आहे.प्रत्येक धर्माची ईश्वराविषयीची आपली एक परिभाषा आहे.  तर अशा या ईश्वराची उपासना जगामध्ये लोक आपापल्या ज्ञानाप्रमाणे आणि पद्धतीप्रमाणे करत असतात.
        आपल्या देशामध्ये विविध धर्माचे लोक त्यांचे सण, उत्सव अगदी आनंदाने साजरे करताना दिसतात,  याला विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड देऊन म्हणजे विजेच्या दिव्यांची रोषणाई, मोठमोठे कर्णे/स्पीकर्स यांच्या साथीने उपासना, उत्सवात भाविक रंगून जातात. देवाची आळवणी सामूहिकरीत्या करताना जो काही नाद तयार होतो त्यातून चैतन्यमय वातावरण होण्यापेक्षा भोवतालच्या लोकांना त्याचा त्रासच अधिक होतो आणि लोकांचे त्रासिक चेहरे पाहून कदाचित त्या देवालाही त्रास होत असावा.
               आपल्या देशाचा कोणताही अधिकृत धर्म नाही, कारण वर म्हटल्याप्रमाणे विविध धर्मिय इथे राहत असल्यामुळे घटनाकारांनीही भारत निधर्मी ठेवण्याची आणि तरीही धर्मस्वातंत्र्य देण्याची चतुराई दाखवली, पण घटनेनं भारतीय नागरिकांना धर्म स्वातंत्र्य दिलंय तरी किती? याची सुरुवात धर्म (Religion) म्हणजे काय? याचं उत्तर घटनेत काय नमूद केलं याची माहिती घेण्यापासून होते. धर्म या शब्दाची व्याख्या जन्माआधी व मृत्यूनंतर अशी परलोकातील बाब अशी करण्यात आली आहे. धर्मग्रंथ हा धर्माचा पाया आहे, त्यातल्या सांगितलेल्या आज्ञांचे पालन करून जर धर्म स्वातंत्र्य उपभोगायचे ठरवले तर राज्यघटना रद्द करावी लागेल कारण मूलभूत हक्क नावाच्या गोष्टीचा फारसा विचार या धर्मग्रंथांनी केल्याचं कुठं वाचनात नाही. घटनेत कलम २५ ते २८ ही मूलभूत हक्कासाठीची कलमे आहेत. कलम २५.१ अनुसार धर्म स्वातंत्र्य ४ बाबींच्या आधीन राहून उपभोगता येऊ शकते.
१. कायदा व सुव्यवस्था :
धर्माशी संबंधीत बाबीमुळे कायदा मोडता कामा नये व दैनंदिन व्यवहार विस्कळीत होऊ नयेत.

२. आरोग्य-वैयक्तिक व सार्वजनिक :
 धर्माने सांगितलेल्या रूढी-परंपरा पाळताना स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याला हानी होता कामा नये.

३. नीतिमूल्ये-स्वातंत्र्य, समता, बंधुता :
वरील नीतिमूल्ये विचारात घेऊन भेदा-भेद , स्पृश्यास्पृश्यता इ. वाईट चालीरीती सोडून धर्मपालन करणे.

४. दुसऱ्याच्या मूलभूत हक्कांची जपणूक:
धर्मातील प्रथा-परंपरा, सण-समारंभ यासाठी दुसऱ्याच्या मूलभूत हककांची पायमल्ली होता कामा नये.
या बाबींचा विचार करून धर्मपालन करणे याचं प्रमाण खूप कमी आहे. सर्वच धर्मियांची या बाबतीत सारखीच वागणूक आहे आणि कुणी वरील बाबींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आधार घेऊन वक्तव्य केलं की लगेच धार्मिक भावना दुखावल्या जातात. धार्मिक उन्मादातून कधी कधी भयानक पडसाद उमटतात म्हणून कुठल्याच धर्माचं उदाहरण इथे न घेतलेलंच बरं.
              हे टाळण्यासाठी वरील सगळ्याच बाबींचे ज्ञान समाजाला देणे ,त्यांचे गैरसमज दूर करणे उदा. Secularism म्हणजे सर्वधर्मसमभाव. Secularism हा धार्मिक बाबींतून झालेला अन्याय निवारण करण्यासाठी आहे. धर्माच्या व्याख्येनुसार परलोक आणि इहलोक अशी भान ठेवून विभागणी करून वागणे गरजेचे आहे.
       हे सगळं मांडता आलं याचं श्रेय राज्यघटनेला आहे कारण स्वतंत्र भारतात राज्यघटनाच (Constitution) सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळेच आम्ही शांततेत नांदू शकतो.
           राज्यघटनेचा विजय असो!                जय हिंद!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मातृ दिनाच्या इतिहासाची कहाणी

                              प्रेम स्वरूप आई वात्सल्यसिंधु आई                  बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी                             ...