सोमवार, २७ जानेवारी, २०२०

काय सांगते संविधानाची उद्देशिका? : भाग -१.

                        
                         (स्रोत : साभार इंटरनेट)
                 
     महाराष्ट्र आणि त्यानंतर मध्यप्रदेश सरकार यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला की शाळेमध्ये प्रार्थनेच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं जावं. पण उद्देशिका म्हणजे काय? संविधान म्हणजे काय? हे सगळे प्रश्न मनात घर करतात. तर आधी त्याची पूर्वपीठिका म्हणजे इतिहास थोडक्यात समजून घ्यायला हवा,
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला इंग्रजी राजवटीपासून स्वतंत्रता मिळाली. आपल्या देशासाठी ही नवीन एक सुरुवात होती. या खंडप्राय अशा देशावर आता नियंत्रण कुणाचं? त्यांनी कसं नियंत्रण ठेवायचं? राज्यकारभार कसा करायचा? या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी नव्याने निवडून आलेल्या ब्रिटनच्या एटली सरकार मधील ३ मंत्र्यांची त्रिमंत्री योजना १९४६ (सदस्य: लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स, आलेक्झांडर) त्यातल्या तरतुदीनुसार भारतीय संविधान सभा (Indian constitutional assembly) निर्माण झाली. (कार्यकाळ: ९ डिसेंबर १९४६ ते २४ जानेवारी १९५०) त्यातल्या ७ समित्यांपैकी एक आणि मुख्य समिती म्हणजे घटना मसुदा समिती [स्थापना: २९ ऑगस्ट १९४७. अध्यक्ष : डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr.B.R. Ambedkar) अन्य सदस्य: अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉ. कन्हैयालाल मुन्शी, गोपाळस्वामी अय्यंगर, मोहंमद सादुल्ला, टी. टी. कृष्णम्माचारी (डी.पी. खैतान यांच्या मृत्युनंतर नियुक्ती १९४८),  एन. माधव राऊ (बी. एल. मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर नियुक्ती)] या समितीने जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी सर्वात मोठ्या लिखित संविधानाचा मसुदा लिहिला. राज्यघटनेच्या सुरुवातीला संविधानाची उद्देशिका (preamble) पाहायला मिळते. काय आहे उद्देशिका? काय सांगते ती आपल्याला?
         संविधानाचा परिचय किंवा प्रस्तावना म्हणजे उद्देशिका. प्रथमतः अमेरिकन राज्यघटनेत सुरुवातीला उद्देशिकेला स्थान दिलं गेलं आणि पुढे हीच परंपरा भारत व अन्य देशांनी जपली. यात घटनेचा अर्क किंवा सारांश आहे. १३ डिसेंबर १९४६ या दिवशी पं. नेहरूंनी घटना समितीसमोर 'उद्दीष्टांचा ठराव' मांडला. यामध्ये संविधानाचा मसुदा कसा लिहिला जावा यासंबंधीची मूलभूत विचारधारा आणि मोठं तत्वज्ञान होतं, त्यातूनच ही उद्देशिका मिळाली. त्यातल्या तरतूदी इथं मांडल्या आहेत.
*भारत हे एक प्रजासत्ताक गणराज्य असेल.
*सत्तेचं उगमस्थान- भारतीय जनता आहे.
*सर्व लोकांना न्याय , स्वातंत्र्य व समता याची हमी आणि संरक्षण दिले जाईल.
*अल्पसंख्याक, मागास आदिवासी, वंचित व मागासवर्ग यांच्या साठी संरक्षक तरतूदी असतील.
*राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाईल.
           संविधान हा आपल्यासाठी मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. भारतात लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेले लोकांचंच राज्य आहे, सत्तेचा उगमच जर लोक आहेत म्हणूनच याची सुरुवात 'आम्ही भारताचे लोक' अशी करण्यात आली आहे. तर अशा भारतीय लोकांनी एकत्र येऊन काय आणि कशाप्रकारे साध्य करायचे आहे, हे या उद्देशिकेत सांगितले आहे. यातल्या महत्वाच्या काय शब्दांमध्ये काय दडलंय हे ही समजून घ्यायला हवं,

सार्वभौम- भारतीय लोक राज्यकारभार करताना कोणत्याही स्वरूपाचे निर्णय घेण्यासाठी कुठल्याही परकीय शक्तीवर अवलंबून किंवा तिच्या प्रभावाखाली राहणार नाही, कारण  यासाठी भारत एक स्वतंत्र देश म्हणून राज्यकारभार करण्यासाठी सक्षम आहे.

समाजवादी- संविधानातल्या राज्यविषयक धोरणामधल्या मार्गदर्शक  तत्वांमध्ये समाजवादाचा भाग आढळतो. भारतात 'लोकतांत्रिक समाजवाद' आहे, 'साम्यवादी समाजवाद' (चीन, क्युबा) नाही. सर्वोच्च न्यायालय म्हणते की लोकतांत्रिक समाजवादाचे ध्येय हे गरिबी, रोगराई आणि संधीची असमानता संपवणे. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद आणि गांधीवादाचं सुंदर मिश्रण आहे.

धर्मनिरपेक्ष- आपल्या देशाचा अधिकृत असा कोणताही धर्म नाही, पण नागिरकांना धर्म पाळण्याचा मूलभूत हक्क संविधानाने दिलेेला आहे(कलम २५-२८)  आपल्या संविधानात धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना आहे, सर्व धर्म (धर्माची लोकसंख्या विचारात न घेता) हे समान पातळीवर आहेत व सरकार दरबारी त्यांना समान वागणूक आहे.

लोकशाही - लोकशाहीचे २ प्रकार पडतात.
प्रत्यक्ष लोकशाही: धोरणे ठरवण्यात जनतेचा प्रत्यक्ष सहभाग. उदा. स्वित्झर्लंड
अप्रत्यक्ष लोकशाही: २ उपप्रकार:-
संसदीय (उदा.भारत) येथे लोकप्रतिनिधी निवडले जातात व ते आपला नेता(पंतप्रधान) निवडतात.
(म्हणून आपली प्रातिनिधिक संसदीय लोकशाही म्हटली जाते.)
आणि अध्यक्षीय (उदा. अमेरिका) येथे अध्यक्ष थेट जनता निवडते.
म्हणजे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी मिळून सरकार बनवतात आणि या सरकारला जनतेच्या कल्याणाचे राजकीय, सामाजिक व आर्थिक निर्णय संविधानाच्या चौकटीत राहून घ्यावे लागतात.

गणराज्य- लोकशाही राजव्यवस्थेचे २ प्रकार:
राजेशाही: राज्य/राष्ट्रप्रमुखपद हे वंशपरंपरेने मिळते. (ब्रिटन)
गणतंत्र/राज्य: राज्य/राष्ट्रप्रमुखपद हे ठराविक काळासाठी जनता निवडते. (अमेरिका)
आपल्याकडे 'राष्ट्रप्रमुख/राष्ट्रपती' हा अप्रत्यक्षपणे निवडून ५वर्षांसाठी निवडून दिला जातो.
न्याय- ३ प्रकारचे न्याय उद्देशिकेत सांगितले आहेत.
सामाजिक, राजकीय व आर्थिक हे मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क यांच्या वेगवेगळ्या तरतूदीद्वारे संरक्षित करण्यात आले आहेत.
सामाजिक न्याय: समाजात जात, धर्म-पंथ, लिंग, वर्ण, रंग इ.
असा कोणताही भेदभाव न ठेवता सर्व जनतेला समान वागणूक देणे म्हणजे सामाजिक न्याय.
राजकीय न्याय: सर्व नागरिकांना समान राजकीय हक्क , सर्वच राजकीय कार्यालयांमध्ये प्रवेशासाठी समानता व सरकारकडे दाद मागण्याचा समान हक्क प्रदान करण्यात आलेला आहे.
आर्थिक न्याय: समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक घटकांवर आधारलेला भेदभाव न करू देणे म्हणजे संपत्ती, अर्थप्राप्ती , मालमत्ता या मुद्द्यांवरून समाजात जी असमानता येते तिला हद्दपार करणे.
वरील ३ प्रकारच्या न्यायाचा आदर्श हा रशियन राज्यक्रांतीकडून (१९१७) घेण्यात आला आहे.

क्रमशः

सोमवार, २० जानेवारी, २०२०

तान्हाजी- २०२० चा पहिला ब्लॉकबस्टर.


                      ( स्त्रोत : साभार इंटरनेट )
                       
                    पुढं खासा उदेभान उभा ठाकलेला
                    तरी सिंहानं गनिमाचा खुर्दा उडवला
                    पन राजपुताचा घाव वर्मी लागला
                   अन् स्वराज्यासाठी प्रान सोडला
            गातो नरवीराच्या पराक्रमाला हो जीs जीs जीs
           मानहानीकारक पुरंदरचा तह, त्यातल्या अटींनुसार ते २३ किल्ले, काही लक्ष होनांचा प्रदेश द्यावा लागला, ऐन उमेदीत आलेलं हिंदुपदपातशाहीचं स्वराज्य मातब्बर मुघल मनसबदार मिर्झाराजे जयसिंग यांच्या अचानक धडकेमुळे कोलमडून गेलं. त्याच स्वराज्याची पुनर्उभारणी करण्याची आवश्यकता होती. काही गड किल्ले घेतलेही पण अजूनही अजेय असा कोंढाणा आणि त्याच्यावर फडकणारा मुघली परचम् जिजाऊ माँसाहेब आणि सिउबाराजांच्या डोळ्यांत कुसळाप्रमाणे सलत होता. महाराजांचा बालपणीचा सवंगडी सुभेदार तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाणा घेण्याचं कबूल केलं आणि ४ फेब्रुवारी १६७० च्या हल्ला करून प्राणार्पण करून गड काबीज केला.
             याच सर्वश्रुत पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या अजय देवगण यांचा अभिनय असलेल्या "तान्हाजी- द अनसंग वॉरीअर" (Tanhaji - the unsung warrior) या सिनेमानं २०२० या वर्षाची दणदणीत सुरुवात केली आहे. १०० कोटी ₹ च्या क्लब (100 crore club) मध्ये वर्णी लावून या वर्षीचा पहिला ब्लॉकबस्टर होण्याचा मान मिळवला आहे. भन्साळी कॅम्पचे प्रकाश कपाडिया आणि सोबतीला ओम राऊत यांनी कथा- पटकथा जबरदस्त लिहिली आहे. तसंही ऐतिहासिक कथेवर सिनेमा बनवणं खूप जोखमीचं काम आहे. इतिहासातला आवश्यक तोच घटनाक्रम निवडणे आणि योग्य सृजनस्वातंत्र्य (cinematic liberty) घेऊन पटकथा वेगवान ठेवण्याचं काम उत्तम केलं आहे. वीररसाला मध्यभागी ठेऊन बाकी रसांच प्रसंगानुरूप मिश्रण खूप छान आहे, आणि बॉलीवूडचा असा एक खास फ्लेवरही टाकला आहे. या दोघांबरोबरच याचं श्रेय जातं ते देवगण कॅम्पचे मेंबर संकलक धर्मेंद्र शर्मा यांना. प्रत्येक पात्राला जिवंतपणा देण्याचं काम कपाडियांच्या संवादांनी फारच उत्तम केलेलं आहे, सिनेमातल्या तोफांपेक्षाही बहारदार संवादांनी टॉकीज दणाणून सोडलं. नुसत्या टाळ्या-शिट्या. सिनेमॅटोग्राफर केईको नाकाहारा यांच्या कॅमेऱ्यातून टिपलेला सिनेमा खूपच सुंदर दिसतो, त्यांच्या गाठीशी मेरी कॉम, इंदू सरकार सारख्या सिनेमांचा अनुभव आहे. कला दिग्दर्शनाचं काम- देवीचं मंदिर, राजगडावरचा वाडा, बाजारपेठ,  इ. छानच, NYvfxwala आणि टीम यांचं काम तर खरच जबरदस्त, सजलाय सिनेमा त्यांच्यामुळं. लढाई हा सिनेमाचा अविभाज्य भाग, action director - रमझान बुलूत , Fight choreographer- माईक मूलर, Fight designer - दोल्गा देअरमन आणि टीम यांनी भन्नाट काम केलं आहे, प्रेक्षकांसाठी हे पाहणं म्हणजे मेजवानी आहे. रंगभूषाकारांनी ही छान काम केलं आहे. (सूर्याजी, शेलार मामा अन्य मावळे यांना मावळी पांढरा टिळा, महाराजांना चंद्रकोर आणि शिवगंध असतं तर look अजून खुलला असता.) नचिकेत बर्वे यांनी वेशभूषा विभागात चांगलं काम केलं आहे, याआधी त्यांनी 'कट्यार, काशीनाथ घाणेकर' या सिनेमामध्येही यासाठी उत्तम काम केलं आहे. (पण मला वाटतं पूर्णिमा ओक - स्वराज्यरक्षक संभाजी, फर्जंद, फत्तेशिकस्त च्या वेशभूषाकार यांनी यांत महारथ मिळवली आहे.) आणि आता कप्तानाबद्दल...नेहमीप्रमाणेच राऊत यांचं दिग्दर्शन उत्तमच. लोकमान्य, तान्हाजी जैसा आरंभ हैं प्रचंड तो आगे बढियाही होगा. आता त्यांनी स्वराज्य या शब्दाचं पेटंट घ्यायला हरकत नाही 😋.
       या सिनेमामध्ये गाणी व background score  हा पण तेवढाच महत्वाचा भाग आहे. संदीप शिरोडकर यांनी background score उत्तम केलेला आहे, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, दबंग, डर्टी पिक्चर सारखे दमदार सिनेमांना याआधी त्यांनी केले आहेत. शंकरा:मेहुल व्यास (जबरदस्त डान्स नंबर आहे हा) माय भवानी:अजय अतुल (Ajay- Atul)( नेहमीप्रमाणेच कडक, यांत "हे उदं उदं" हे ऐकताना विशेष छान वाटतं, अजय-अतुल आहेत म्हटल्यावर असं मराठी लोकसंगीत बाजाचं एखादं गाणं हवं होतं असं वाटतं) तिनक तिनक- मस्त रोमँटिक वाटतं , घमंड कर:सचेत-परंपरा हे गाणं डोक्यात घुमत राहतं, सगळ्यात जास्त याचाच प्रभाव पडतो ते याच्या चालीमुळं, "रा रा रा" ही तानाजी थीम ठरलीय, अनिल वर्मा यांचे शब्द आणि सचेत- परंपरा यांचे स्वर आणि संगीत सगळंच कडकडीत.(शंकरा या गाण्याच्या श्रेयनामावलीत जसं आदर्श शिंदे (Adarsh Shinde) यांच नाव आहे तसं घमंड कर श्रेयनामावलीत गणेश चंदनशिवे (Ganesh Chandanshive) यांचं नाव का नाही?) युरी सूरी- मिर्झाराजे जयसिंग, अंगद म्हसकर-मोरोपंत या नटांना खूपच कमी स्कोप आहे हे बघून जरा वाईट वाटलं. अजिंक्य देव-पिसाळ, शशांक शेंडे-शेलार मामा, देवदत्त नागे-सूर्याजी यांची कामं लक्षात राहण्याजोगी. कैलाश वाघमारे-चुलत्या व गीत्याचं पात्र करणारा या दोघांचं विशेष कौतुक. लुक केनी-औरंगजेब, एक उत्तम प्रयत्न. पद्मावती राव- जिजाऊ मासाहेबांच्या मूर्तिमंत करारीपणाचं दर्शन. शरद केळकर - युगप्रवर्तक शिवछत्रपतींची भावनिक छटा सुंदर पद्धतीनं दाखवली. पाहूनच मुजऱ्यासाठी मान लवते. उदयभान- सैफ (Saif Ali Khan) खणखणीत कामगिरी, (लंगडा त्यागीचा अनुभव. नवरदेवाच्या वेशात नाचतानाच फक्त खिलजीचा भास झाला.) काजोल- ढाण्या वाघाची वाघीण शोभलीय. जबरदस्त. अजय देवगणने (Ajay Devgan) तर नेहमीच्या सहजतेनंच भूमिका वठवली आहे. ९९ सिनेमांचा तगडा अनुभव. नादखुळा परफॉर्मन्स. (पण गणेश यादव- फर्जंद आणि अजय पुरकर-फत्तेशिकस्त मला राहून राहून आठवत होते.)
                जीवंत बुद्धिबळातला उदयभानचा सहभाग, तो राठोड उदयभानपेक्षा उदयखान वाटेल याचा आटापिटा, कल्पनातीत नागीण तोफ, खऱ्या इतिहासापेक्षा घेतलेली लिबर्टी यागोष्टी बाजूला ठेवू पण असे ऐतिहासिक सिनेमे येण्याआधीच बोंबाबोंब का सुरू होते माहीत नाही? प्रसंग बदला, संवाद बदला; भावना दुखावल्या आहेत. भावना इतक्या तकलादू कशा काय असतात? खोटा/ विपरीत इतिहास दाखवला म्हणून शंखनाद. लोकहो Disclaimer नावाचा प्रकार आहे सुरुवातीला (कदाचित नवाबसाहेबांनी प्रीमियरला हे वाचलं नसावं) एकदा सेन्सर बोर्डानं दिली परवानगी झालं की मग! बाकीच्यांची लुडबूड काय कामाची? आधीच तयार झालेल्या धर्मांध वातावरणात निधर्मी देशात हा सिनेमा अजून धार्मिक तेढ निर्माण करतो आहे, अशी टीका मीडियानंही केली.  मध्ययुगात फक्त सत्तासंघर्ष नव्हता, धर्माचा राजकारणावर तेवढाच प्रभाव होता. वर्तमानात लोकशाही असताना इतका प्रभाव आहे, राजेशाहीत का नसेल? एक वेगळा लेख लिहावा लागेल हा असा विषय आहे. असो...
      पण एकूणच सिनेमा विशेष करून लढाई पाहताना लहानपणी ऐकलेल्या ओळी खूपच आठवत होत्या,
             धर्मासाठी झुंजावे। झुंजोनी अवघ्यासी मारावे।
             मारिता मारिता घ्यावे। राज्य आपुले।।
             देव मस्तकी धरावा। अवघा हलकल्लोळ करावा।
             मुलुख बडवावा की बुडवावा। धर्मसंस्थापनेसाठी।।

                              हर हर महादेव
                    🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻

मातृ दिनाच्या इतिहासाची कहाणी

                              प्रेम स्वरूप आई वात्सल्यसिंधु आई                  बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी                             ...