गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

Irrfan- संघर्षाचा सोबती.

     

                                स्रोत : साभार इंटरनेट
   
   आजच्या घडीला संपूर्ण जगावर कोरोना (Covid 19) नावाचं भयानक संकट आहे, त्यातून सुटका व्हावी यासाठी जगाचा जोरदार संघर्ष सुरू आहे. पण दि. २९/०४/२०२० या दिवशी एक संघर्ष थांबला, तो कायमचाच. इरफान खानला (Irrfan Khan) २ वर्षापूर्वी neuroendocrine च्या कर्करोगानं ग्रासलं पण त्यातून तो बरा झाला होता. शेवटच्या सिनेमा अंग्रेजी मीडियमच्या प्रमोशनवेळी त्याची तब्येत पुन्हा बिघडली आणि दवाखान्यातून प्रेक्षकांसाठी एक संदेश पाठवला, त्यात त्याचं शेवटचं वाक्य होतं “And yes wait for me.” असं वाट बघायला लावून इरफान जो गेला तो गेलाच. इरफान आणि संघर्ष यांचं जवळचं आणि घट्ट नातं, तसं मायानगरी मुंबईमध्ये सिनेसृष्टीत करियर करण्यासाठी येणार्‍या जवळपास प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो, पण ‘साहबजादे इरफान अलि खान’ साहेबांची बात काही औरच होती. यासाठी संघर्ष व त्यांची मैत्री कशी झाली हे ही फिल्मी स्टाइलनं फ्लॅशबॅक मध्ये नको का बघायला!
     इरफानचं बालपण गुलाबी शहर जयपूरला गेलं, टोंक या गावी त्याच्या मावशीच्या घराजवळ एक सिनेमागृह होतं, म्हणजे घराची आणि सिनेमागृहाची भिंतच एक म्हणून कधीही सिनेमा पाहायला तो आणि त्याची भावंडं जायची बहुतेक तिथं त्याची सिनेमाशी ओळख झाली. दुपारच्या वेळी ही लहान मुलं खेळताना नाटक करण्याचा प्रयत्न करत, कदाचित तेंव्हापासूनच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली असावी. पण त्याला क्रिकेटपटू व्हायचं होतं त्याची निवडही प्रथम श्रेणी क्रिकेट साठी झाली होती, पण तो तिथं जाऊ नाही शकला. त्याच्या एका जवळच्या व्यक्तीनं एकदा राजेश विवेक(लगान मधला ‘साधू’) बद्दल कौतूक करताना इरफानला सांगितलं की तो एक उत्तम कलाकार आहे आणि तो Natinal school of drama मध्ये शिकला आहे. यामूळं प्रभावित झालेल्या इरफाननं मनाशी ठरवलं होतं की आपणही तिथंच जायचं पण त्याच्या कुटुंबात त्याला अभिनय क्षेत्रात करियर साठी परवानगी मिळणार नाही कारण परिवारात हे हलक्या दर्जाचं काम मानलं होतं म्हणून त्यानं थाप मारली की एम.ए नंतरचं पुढचं शिक्षण घ्यायला दिल्लीला जावं लागणार आहे, त्यानंतर तो जयपूर विद्यापीठात प्रोफेसर होईल. इकडे NSD मध्ये प्रवेश मिळवायचा झाला तर कमीतकमी १० नाटकांमध्ये काम केलं असलं पाहिजे असा नियम होता पण त्याला तर कसलाच अनुभव नव्हता म्हणून त्यानं इथंही थाप मारली आणि १९८४ साली NSD मध्ये प्रवेश मिळवला. इथच संघर्ष त्याला पहिल्यांदा भेटला कारण तेंव्हाच त्याचे वडील वारले होते. आता घरात मोठा मुलगा-कर्ता पुरुष तोच होता आणि घरातून आता पैसा मिळणार नव्हता. यावर मात करून त्यानं शिष्यवृत्ती मिळवली आणि शिक्षण पूर्ण केलं. आणि त्याच्या कष्टाचं फलित म्हणून त्याला मीरा नायर यांच्या सिनेमात पहीला ब्रेक मिळाला. नाव होतं ‘सलाम बॉम्बे’ (Salam Bombay). पण त्याच्या कामावर कात्री लागली, म्हणून हताश होऊन तो टेलिविजनकडे वळला. त्याला सुरूवातीला एका रुसी कलाकृतीवर आधारित एका नाटकात (लाल घांस पर नीले घोडे) लेनिनची भूमिका मिळाली, ९०च्या दशकांत त्याला भारत एक खोज, चाणक्य, सारा जहा हमारा, बनेगी अपनी बात, चंद्रकांता सारख्या मालिका मिळाल्या, यामुळे कमाई तर होत होती, पण चंदेरी पडद्यावर काम करण्याची इच्छा असणार्‍या त्याचं छोट्या पडद्यावर मन रमत नव्हतं. त्याला एकसूरी भूमिका करायच्या नव्हत्या, त्याला कोणत्याही साच्या मध्ये अडकायचं नव्हतं. ज्या सिनेसृष्टी यश आणि कमाई हे मूलभूत तत्वज्ञान आहे, पण त्याच्या आतली जी जिद्द होती ती केवळ यश या संकल्पनेसाठी साठी भुकेली नव्हती, स्वतःच्या पद्धतीनं, स्वतःच्या दृष्टिकोनातून यश मिळवण्याची होती. या फिल्मीदुनियेत असं वेगवेगळ्या भूमिका मिळण्याची इच्छा धरणं आणि यासाठी वेगळा विश्वास बाळगणं म्हणजे त्या काळात बेईमानीच्या गोष्टी होत्या. त्यात त्याचं व्यक्तिमत्व आधीच मितभाषी, लाजरं; कुणाकडे आपले फोटो दाखवायला जाणं व सिनेमात रोल मिळण्यासाठी त्या व्यक्तिला impress करणं त्याला जमत नव्हतं. कदाचित करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा नकारात्मक परिणाम व्हायचा, यामुळंच त्याचा संघर्ष जोरदार बनत होता. १९८८-२००० पर्यन्त तो सिनेमा-टीव्ही दोन्हीकडे मिळेल तशा भूमिका करत राहिला पण त्याला ओळख मिळायची होती. २००१ मध्ये त्याला आसिफ कपाडीयांच्या ‘वॉरियर’ (Warrior) मध्ये मुख्य भूमिका मिळाली. या सिनेमाला मानाचा बाफ्टा पुरस्कार मिळाला पण सिनेमा जरी ब्रिटिश असला तरी  ब्रिटिश वंशाचे मंडळी नाहीत म्हणून ऑस्करसाठी ब्रिटनकडून अधिकृतरित्या पाठवण्यात आला नाही. त्याचा जवळचा मित्र- NSDचा सहपाठी तिग्मांशू धूलिया दिग्दर्शित ‘हासिल’ २००३ साली आला. त्यातल्या ‘रणविजय सिंह’ या भूमिकेसाठी त्याला पहिला-वहिला फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare award) मिळाला. त्याला ‘हासिल’मूळं राष्ट्रीय स्तरावर आणि ‘वॉरियर’मूळं आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. २००३ मध्येच शेक्सपियरचा कट्टर चाहता संगीतकार- दिग्दर्शक विशाल भारद्वाज यानं ‘मॅकबेथ’वर आधारित ‘मकबूल’ हा सिनेमा बनवला, यातल्या इरफानच्या ‘मियाँ मकबूल’ या भूमिकेचं कौतूक झालं, हा सिनेमा कान्स, टोरण्टो इथल्या मानाच्या चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला.
     इरफान जरी शांत, लाजाळू स्वभावाचा असला तरी रोखठोक होता. या त्याच्या रोखठोकपणामुळं तो आणि तथाकथित कट्टर धर्मवादी आमने-सामने आले होते. एकदा जयपूरमधल्या कार्यक्रमामध्ये त्यानं आपलं मत प्रकट केलं होतं की आताच्या परंपरांमध्ये कुर्बानीचा अर्थच समजून घेतला जात नाही. बाजारातून एक बोकड आणणं आणि दुसर्‍या दिवशी त्याचा बळी देणं ही कुर्बानी असू शकत नाही. नंतर एका टीव्ही कार्यक्रमामध्ये त्यानं तथाकथित धर्ममार्तंडांना रमजान व मुहर्रमच्या वेळी पाळल्या जाणार्‍या प्रथा तपासून पाहण्याचा सल्ला दिला. पुढे तो म्हणाला होता की रमजानमध्ये रोजे पाळण्यापेक्षा त्या काळात आत्मपरिक्षण करावं. तो म्हणायचा, “लहानग्यांच्या निष्पापपणावर ज्याप्रमाणं माया-प्रेम येतं तसं माझं देवाबरोबरचं नातं होतं पण नंतर ते हळूहळू संपत गेलं. रुढींवरून माझं मन उडून गेलं, कारण ती एक सौदेबाजी असते की तुम्ही अमूक केलं तर तुम्हाला अमुक मिळेल. परंपरेच्या मार्गावर चालायच्या भानगडीत मी पडलोच नाही.” या त्याच्या परखड स्वभावामुळं त्याचा कट्टरतावाद्यांशी संघर्ष झाला होता.
    २०१८ च्या मार्चमध्ये इरफाननं ट्विटरद्वारे कळवलं की त्याला Neuroendocrine tumor आहे. तो लंडनमध्ये यासाठी उपचार घेत होता. त्यानं एक वर्ष उपचार घेतले. २०१९ च्या फेब्रुवरी महिन्यात तो भारतात परतला. म्हणजे संघर्षाचा हा अजून एक अध्याय होता, पण तो अचानक होता आणि वेदनादायी सुद्धा. त्यानं आजाराचं निदान झाल्यानंतर एक पत्र लिहिलं होतं ते कधीही वाचलं नक्कीच डोळ्यांच्या कडा पाणावतील.
    त्याची NSDची अजून एक सहाध्यायी आणि त्याची पत्नी सुतपा; तिनं एका मुलाखतीत सांगितलं, “NSD मध्ये शिकत असताना कायम त्याच्या हातात संहिता असायच्या, माझ्या घरी जेंव्हा सगळे मित्र-मैत्रिणी यायच्या तेंव्हा बाकी सगळे दंगा-मस्ती करण्यात रमलेले पण इरफान माझ्या भावाचं पुस्तकांचं कपाट होतं त्यातली पुस्तकं वाचण्यात मग्न झालेला असायचा. याबाबतीतली त्याची कायमच भूक अशा पद्धतीची होती की कमी वेळात त्याला खूप काही करता येईल.” हा त्याचा वेळेशी असलेला संघर्ष होता, कदाचित त्याच्याकडे असलेल्या कमी काळाची त्याला कल्पना असल्याप्रमाणं?
     
       

                                     (स्रोत : साभार india.in.pixel)
  
     सलाम बॉम्बेमधला लेखक, मकबूलचा मियाँ मकबूल, पिकुचा राणा चौधरी, लाइफ इन ए मेट्रोचा मॉन्टी, डी-डे चा शाहवली खान, रोगमधला पोलिस ऑफिसर, लंचबॉक्सचा साजन फर्नांदेस  या आणि अशा अजून भूमिका या बॉलीवुड सिनेमांत आणि जुरासिक वर्ल्ड, लाइफ ऑफ पाई, स्लमडॉग मिलिनेअर, द माइटी हार्ट, इन्फेर्नो या आणि अन्य हॉलीवुड सिनेमांमध्ये त्यानं वठवलेल्या भूमिकांमध्ये वेगळेपण होतं, आणि ते राखणं, स्वतः स्वतच्या इमेजला तोडणं आणि आपलेच एकेक मुखवटे उतरवत जाणं हीच त्याची खासियत होती. पानसिंग तोमरच्या भूमिकेसाठी त्याला त्यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्म फेअर दोन्ही मिळालं होतं. तो असा एकमेव भारतीय कलाकार होता की त्यानं काम केलेल्यापैकी दोन सिनेमे ऑस्कर पुरस्कार प्राप्त आहेत. कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल त्याचा पद्मश्री देऊन सन्मानही केला गेला. केवळ भुमिकांमध्येचं नाही वेगळी विचारसारणी असणं, वेगळी वाट चोखाळणं इतकंच काय तर त्याला झालेला आजार त्यातही वेगळेपण. पैसा, प्रसिद्धी असूनही त्याची जिद्द वैविध्यपूर्ण भूमिकांसाठीची होती. त्याचं म्हणणं होतं, “मला माझ्या मधलं रोमॅंटिक पात्र शोधायचं आहे, बाल चित्रपटात काम करायचं आहे, अॅक्शन, फॅंटसी, सांगीतिक, बायोपिक अशी बर्‍याच भूमिका करायच्या राहिल्या आहेत.”  असं वाटतं की असे अभिनेते दर नवीन भूमिकेसाठी नव्यानं जन्माला येतात, भूमिकेच्या कोंदणात बसण्यासाठी नव्यानं स्वतःला पैलू पाडतात. त्यानं सफाईदारपणे अभिनय केला पण वेगळेपण जपण्यासाठी मोठा संघर्ष चालू होता म्हणजे तो त्याचा सोबतीच बनला होता.
आता दोघंही नाही आहेत. पण तो कायम आपल्या हृदयात राहील आणि त्याचे हे शब्द ही,

दर्या भी मै, दरख्त भी मै, झेलम भी मै, चिनार भी मै, दैर हूं, हरम भी हूं, शिया भी हूं, सुन्नी भी हूं, मै हूं पंडित, मै था , मै हूं और मै ही रहूंगा….

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मातृ दिनाच्या इतिहासाची कहाणी

                              प्रेम स्वरूप आई वात्सल्यसिंधु आई                  बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी                             ...