(स्रोत : साभार इंटरनेट)
तीन शतकांच्या पारतंत्र्याच्या भयाण काळरात्रीनंतर या महाराष्ट्र देशी स्वातंत्र्य सूर्याचा उदय होत होता. पण स्वराज्याची सोनेरी पहाट होण्यातही अजून अडथळे होतेच कारण झुंजूमंजू होण्याआधीच्या गडद अंधाराचे प्रहर कदाचित घट्ट पाय रोवून होते. ती शिवसुर्याची किरणप्रभा काळोखाच्या शृंखलांमध्ये अडकलेल्या भूमीकडे झेपावत होती तिला मुक्त करण्यासाठी. आणि अश्वारूढ झालेल्या शिवभास्कराने शास्त्यारूपी भयाण अंधकाराला लाल महालात शिरून नेस्तनाबूत केले व अवघी रयत उजळून टाकली. हाच मराठी इतिहासातला पहिला सर्जिकल स्ट्राईक!
इतिहास (History) मुळात जिव्हाळ्याचा विषय व छत्रपती हे दैवत म्हणून या कालखंडाबद्दल जितकं माहीत करून घेता येतं तितकं घेत आलो आहे म्हणून या सिनेमाची उत्सुकता फेसबुकावर त्याच्या संदर्भातली मराठी सिनेमुलखाचे शिलेदार दिग्पालजी लांजेकरांनी (Digpal Lanjekar) टाकलेल्या पहिल्या पोस्टपासून होती. पोस्टर पाहून चित्रपटाचं कथानक काय असेल याचा अंदाज आला होता, उत्सुकता वाढत चालली होती. चित्रपट पाहून समाधान झालंं. "आरंभ हैैं प्रचंड" प्रमाणे फर्जंद (Farjand) गाजलाच, त्याचा गाठीशी असलेला अनुभव या सिनेमाच्या प्रोसेस दरम्यान उपयोगाला आला असावा हे दिसून येतं. शिवचरित्रातल्या सगळ्याच घडामोडी या नाट्यपूर्ण आणि थरारक आहेतच पण त्यातल्या एका विशिष्ट घटनेवर कलाकृती बनवणं हे आव्हान आहे. कारण मूळ ऐतिहासिक घटनेला अनुसरून बाकीच्या कथानकाची गुंफण करणं, जेणे करून दृश्यगणिक सिनेमा पुढे सरकताना प्रेक्षकांच्या मनात घर करत जाईल यासाठी अनावश्यक गोष्टी टाळून एक दमदार पटकथा लिहिणं हा मोठा टास्क असतो. दिग्पाल यांनी हे काम ऊत्तम केलं आहे. इतिहासाची मोडतोड न करता आवश्यक तिथे सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन पटकथा लिहिणे हे त्यांनी योग्य साधलंय. शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्य/ management skill व मनुष्य रत्न पारखण्याची कला/ H. R. Skill याचं दर्शन प्रेक्षकांना कसं घडेल याच्यावर काटेकोर लक्ष दिलं गेलं आहे. अथपासून इति होईपर्यंत ते पडद्यावरचे आणि पडद्यामागचे असे सगळे कलाकार यांना त्या माहोलमध्ये ठेवून एक उत्तम कलाकृती घडवणं हे त्यांना जमलंय, मी वैयक्तिक त्यांच्या संवादांंच्या प्रेमात आहे. तत्कालीन मावळी प्राकृत भाषा, औपचारिक मराठी आणि विशेषतः ऊर्दूतील संवाद हे कान तृप्त करतात. एकूणच त्यांचा अभ्यास दांडगा आहे, सुयोग्य योजना करणे ही शिवरायांची शिकवण त्यांनी चांगलीच आत्मसात केली आहे, म्हणूनच दिग्पालजी हे एक उत्तम दिग्दर्शक, पटकथाकार आणि संवादलेखकांपैकी आहे हे परत सिद्ध झालं आहे.
आर्ट डायरेक्टर 'प्रतिक रेडीज' यांच्या करता हे जास्त आव्हानात्मक झालं असावं कारण बहुतांश भाग हा रोहिडा, पन्हाळगड, राजगड या रिअल लोकेशन्स वर शूट झाला आहे तिथल्या वातावरणाचा परिमाण होत असतो. मुघल-मराठा दालने तसेच भटारखाना व स्वयंपाकाला लागणारी तत्कालीन भांडी व इतर साहित्य, लालमहाल, त्यातला दरबार असे सर्व सेटस् त्यांनी अतिशय उत्तम उभे करून ते आपणाला साक्षात शिवकाळात घेऊन गेले आहेत. सिनेमाला अजून खुलवणारी गोष्ट म्हणजे पात्रांच्या वेशभूषा; उझबेकी, हबशी हा फरक तसंच शिंदेशाही पगडी-फेटे याची पात्रानुसार निवड हे अभ्यासपूर्ण व उत्तम काम 'पूर्णिमा ओक' यांनी केलं आहे. जोडीला रंगभूषासुद्धा अप्रतिम. राजगडावरील पद्मावती माचीवरच्या नेढ्याच्या ठिकाणी चित्रित केलेलं सुंदर दृश्य पाहता 'रेशमी सरकार' यांच्या कॅमेऱ्यातून चित्रित झालेला सिनेमा खूप छान दिसतो. 'बब्बू खन्ना' यांची साहसदृष्ये ही उत्तम. 'प्रमोद काहर' आणि सहकारी यांनी संकलनाचं कामही खूप छान केलं आहे. 'देवदत्त मनीषा बाजी' यांचं पार्श्वसंगीत आणि गााणीही छान आहेत. मराठी लोकसंंगीत आणि शिवकाल हा नातेसंबंध समजूूून सूरेेख चाली बांधल्या आहेेेत. गोंधळ आणि अभंग व शेवटचं विजयगीत मस्तच पण 'जत्रेला चला' ही 'तुंबडी' (एक लोककला प्रकार) , ठुमरी आणि कव्वाली हे जास्त भावलं. यांवर कडी म्हणजे त्यांनी बाजीप्रभू, जिजाऊसाहेब, महाराज यांच्या music themes बनवल्या आहेत त्या एकदम कडक! तुंबडी गीत संकलनात कापलं गेलं असावं असं वाटत ते पाहायला अजून मजा येईल (विडिओ प्रसिद्ध करावा असेल तर) त्याचे शब्द सुंदर आहेत. खांडेकर आणि तुकोबारायांच्या रचनांबद्दल मी पामर काय बोलणार! पण गोंधळ सुद्धा पारंपरिक वाटला म्हणजे दिग्पालजींनी रचलाय यांवर विश्वास नाही बसत.
मृणाल कुलकर्णी- जिजाऊसाहेब; दुसऱ्या माँसाहेब नाहीच मिळणार! नेहमीप्रमाणेच जबरदस्त, चिन्मय मांडलेकर-शिवराय यांची संवादफेक दमदार आहेच पण भावमुद्रांमधूनही महाराज उत्तम साकारले आहेत, अजय पुरकर-खरेच 'नरवीर' शोभलेत, मृण्मयी देशपांडे- केसर, निखिल राऊत-किसना यांनी जीव ओतून काम केलं आहे, समीर धर्माधिकारी-नामदारखान हे भाव खाऊन गेले आहेत. आस्ताद काळे-कारतलबखान चांगला निभावलाय, तृप्ती तोरडमल-रायबाघन या त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे चालवणार नक्कीच, रमेश परदेशी/पिट्या भाई- पण भारीच आहेत, अक्षय वाघमारे-कोयाजी बांदल, विक्रम गायकवाड-चिमणाजी, रुची सावर्ण-सोयराबाई साहेब,नक्षत्रा मेढेकर -बहू बेगम, प्रसाद लिमये- बाळाजी, ऋषी सक्सेना- फत्ते खान, सिद्धार्थ झाडबुके इ. सर्व रंगभूमीचे सेवेकरी असल्यामुळे सगळ्यांचा अभिनय खणखणीत. शास्ता खान- अनुप सोनी हे हिंदी भाषिक असले तरी त्यांचीही नाळ रंगभूमीशी जोडल्यामुळे त्यांनी या प्रतिऔरंगजेबाच्या मूर्तिमंत क्रौर्याचं दर्शन घडवलंय. अंकित मोहन (Ankit Mohan) हे आता "दिल्ली का छोकरा" वाटतच नाहीत, पक्के सह्याद्रीचे ढाण्या वाघ वाटतात. हरीश दुधाडे हे बहिर्जी नाईक अक्षरशः जगलेत, त्यांच नृत्य-अभिनय हे सर्वच कडकडीत.
कंक- सिधोजी कुस्तीसाठी लाल माती हवी होती का? कात्रज घाटाचं दृश्य अजून फुलवता कसं आलं असतं? हा झाला समीक्षणाचा भाग! तो नको कारण मी तितका मोठा नाही. पण त्यासाठीचे दमदार VFX व बजेट ही कदाचित मराठी चित्रसृष्टीची थोडी कमजोर बाजू! असो पण असे सेवेकरी जर या मायमराठी चित्रसृष्टीला मिळणार असतील तर तीही तेलुगू-तामिळप्रमाणे (Tollywood) विश्वात डंका वाजवेलच!
तर या फत्तेशिकस्त साठी इतकंच म्हणावं लागेल,
भले भले!.!.!
छत्रपती शिवाजी महाराज की जय!.!.!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा